Thursday, June 28, 2012

दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग - ५



दुसरे दिवशीची सकाळ उगवली ती एक बारीकशी अडचण घेऊनच. सर्वसाधारणपणे किल्ल्यांवर पाण्याची फारशी अडचण नसते (उन्हाळी ट्रेक वगळता) आणि मुक्कामही शक्यतो पाणवठ्या आसपास असतो. पण एक तर रात्री किल्ला सर केल्यामुळे पाणी कुठे आहे का नाही हेच माहीती नव्हते. त्यामुळे प्यायला तर नाहीच नाही आणि सकाळच्या काही कार्यक्रमांसाठीही नाही अशी परिस्थिती ओढवली.
अर्थातच, ट्रेकर मंडळींना असल्या चिंता फार भेडसावत नाहीत. त्यामुळे त्यावर मात करून आम्ही किल्ला भटकायला निघालो.
सगळ्यात महत्वाचे सांगायचे झाले तर किल्ल्याने प्रचंड, अतिप्रचंड निराशा केली.
कित्येक वेळा आपण पुरातत्व खात्याच्या आठमुठेपणाबद्दल ऐकले आहे. पण ते तसे राहीले नाही तर काय होते याचे सामानगड हे एक ज्वलंत उदाहरण आहे. किल्ल्याचा जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली त्याचे मूळचे गडपण हरवून टाकून एका पिकनिक स्पॉटचे स्वरुप देण्यात आले आहे. मुळच्या जांभ्या खडकाच्या भक्कम बुरुजांवर साध्या विटांचे बांधकाम आणि त्यावर गेरू फासून इतके भयावह स्वरूप दिले आहे की पावलोपावली संताप होत होता.





गडावर छानशी झाडी राखली आहे पण तीही इथली स्थानिक नाही तर सामाजिक वनीकरणातून लावलेली निलगिरी जी इथल्या जैवविविधतेला अत्यंत घातक.


हा सगळा उद्योग ज्याने कुणी केला त्याला धरुन चांगले बडवून काढावेसे वाटत होते.
मग तशाच उदासवाण्या मनाने गडफेरी उरकली...
गडावर एक प्राचीन विहीर आहे..सुदैवाने अजूनही ती शाबूत आहे त्यामुळे तिथे काही फोटोसेशन केले..



गडाच्या बाहेर मस्त मारूती मंदीर आहे. सुदैवाने शनिवार असल्याचे लक्षात होते त्यामुळे त्या भिमरूपाचे स्तोत्र म्हणून त्याचे आशिर्वाद घेतले आणि पुन्हा गढींग्लज गाठले. आता उत्सुकता होती ती आमचे ऐतिहासिक घर (हो महत्वाचा नसला तरी फडणीस घराण्याचा म्हणून काहीतरी इतिहास असेलच ना स्मित)
पुन्हा त्या काकांना फोन केला आणि ते अगदी तत्परतेने येऊन आम्हाला माझ्या घरी घेऊन गेले.
घर लहानसेच, कौलारू आणि बाबांच्या काळाशी साम्य दाखवणारे होते. बाकीचे गाव वाढले पण हे घर मात्र तिथेच थबकून राहील्यासारखे वाटत होते.
थोडेसे वाकून त्या ठेंगण्या दारातून आत प्रवेश केला आणि अगदी अंगावर रोमांच उठले. काहींना यात अती केल्यासारखे वाटेल...साध्या घरासारखे घर त्यात काय ऐवढे..पण माझ्यासाठी ते नुसते घर नव्हेत. तिथे होते माझ्या आज्जी आजोबांचे आशिर्वाद, माझ्या बाबांनी, काकांनी, आत्यांनी घालवलेल्या बालपणच्या स्मृती, त्यांचे राग, लोभ, प्रेम, जिव्हाळा सगळे काही होते आणि ते मी अगदी अनुभवत होतो त्या क्षणी.
आम्ही ज्यांना घर विकले त्यांनी एकदम ऐसपैस स्वागत केले. खरतर मी अगदीच आगंतुकासारखा त्यांच्या घरी टपकलो होतो आणि माझा अर्थाअर्थी त्या घराशी संबधही नव्हता पण ज्या प्रकारे माझे स्वागत झाले त्याने अक्षरश माझ्या डोळ्यात पाणीच तराळले.
त्या कुटुंबाने घराचे नाव तसेच ठेवले होते इतकेच काय आजही विजेचे किंवा इतर बिले फडणीसांच्याच नावावर येतात.
"तात्यांनी (माझे आजोबा) आमचे खूप काही केले. आम्हाला ही वास्तू खूपच लाभली. त्यामुळे आम्ही नाव बदललेच नाही,"
ते काका सांगत होते.
"आज आता खूप दिवसांनी घराचे मूळ मालक आलेत घरी त्यामुळे अगदी छान वाटतय. आधी कळवलं असतत तर काहीतरी आणून तरी ठेवलं असतं"
अरे बापरे, मी मालक...मी आवंढा गिळला.. स्मित
तोच आतून आज्जींचे बोलावणे आले..एकापाठोपाठ एक असलेल्या खोल्या पार करत मी स्वयंपाकघरापर्यंत जाऊन ठेपलो...
"अरे तु अरूणचा मुलगा का...??"
मी आपला हो हो म्हणत नमस्कार करत तिथेच फडताळाला टेकून बसलो. आणि मग आजींच्या आठवणींना जो काही उत आला की बास.
हा काय करतो, तो कुठे असतो..आणि मग आमच्याच अनेक नातेवाईकांच्या आठवणी..ज्यातली निम्मी नावे मी कधीतरी अंधुक ऐकल्यासारखी वाटत होती.
"तुला अण्णाचा थोरला वसंता माहीती असेल ना..तो लंडनला गेलाय म्हणे..."
मला इथे अण्णा कोण हेच लक्षात येईना त्यात त्यांचा थोरला आता कुठे असतो हे तर फारच झाले.
आज्जीं ९० पुढच्या असाव्यात पण अजूनही आवाज खणखणीत आणि स्मरणशक्ती प्रचंड दांडगी..मी मनोमन त्यांना दंडवत ठोकले आणि घर न्याहाळण्याच्या बहाण्याने तिथून सुटका करून घेतली.
तोपर्यंत त्यांनी दोन्ही सुनांना कामाला लावत चहा-पोहे करायला लावलेच.
"येत जा बाबा अधुन मधुन..आपलंच घर आहे..बायका-पोराला पण घेऊन ये दाखवायला..."
काय वाटत होते त्यावेळी सांगता येत नाही पण कसाबसा डोळ्यातले पाणी परतावून लावत होतो एवढे मात्र आठवते.
आता पुढचे उद्दीष्ट होते नेसरी...
स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या अपूर्व बलिदानाने पवित्र झालेले स्थान...
गावात प्रवेश केल्या केल्याच प्रतापरावांचा भव्य अश्वारूढ पुतळा समोर येतो.



पुतळ्याच्या उजव्या बाजूने स्मारकाकडे जाण्याचा रस्ता आहे...
सुदैवाने, अन्य इतिहासीक पुरुषांच्या तुलनेत प्रतापरावांचे स्मारक खूपच चांगल्या परिस्थितीत आहे. छानसे बांधकाम, राखलेली बाग, सात ढाली आणि सात तलवारी आणि या पराक्रमाचे यथार्थ वर्णन करणारी माहीती असे सगळे काही...





पण मला सगळ्यात जास्त काही आवडले असेल तर आवारात असलेली महाराजांची रेखीव मुर्ती.. महाराजांच्या चेहर्यावर इतके करारी भाव आहेत ना की आपण त्या नजरेला नजर मिळवूच शकत नाही..आपोआप डोळे खाली झुकतात...



नेमके आम्ही गेलो तेव्हा स्मारक बंद व्हायची वेळ आली होती आणि महाराजांच्या समोर लोखंडी गेट. त्या गेटमधून कॅमेरा घुसवून जितका शक्य होता तितका चांगला फोटो घेण्याचा प्रयत्न केला.
महारांजाना, प्रतापरावांना आणि त्या सहा अनामिक वीरांना मुजरा घातला आणि गंधर्वगडाच्या दिशेने निघालो...
सूर्यास्त होऊ घातला होता आणि गडावरून छानसे प्रचि मिळण्यासाठी धडपड होती. पण जातानाच एक मस्त फ्रेम मिळाली ही अश्शी...


(फोटोवर कसलेही संस्करण केलेले नाही..पिकासा वापरून फ्रेम आणि वॉमा टाकलाय फक्त)
अर्थात त्यात वेळ गेल्यामुळे गडावर पोचायला थोडा उशीरच झाला आणि सूर्यमहाराजांना गाठण्यासाठी जाम धावपळ उडाली..
अमेय, रोहन तुडतुडीत असल्याने ढेकळे, मातीवरून टणाटण उड्या मारत माचीपर्यंत पोचले देखील. मला मात्र त्यांच्या गतीने धावणे होईना. त्यामुळे मी काहीश्या वैतागाने तिथूनच जमेल तसा फोटो काढण्यासाठी कॅमेरा हातात घेतला आणि अहो आश्चर्यम...

दैव माझ्यावर तुडुंब प्रसन्न होते बहुदा आज..सकाळी भुंग्या, मग हायवेवर तो गाडीचा शॉट आणि इथेही सहजगत्या एक भारी फ्रेम मिळाली..



नुसत्या सूर्याचे फोटो काढण्याऐवजी त्यात ह्युमन एलीमेंट वाढल्यामुळे फोटोला भारीच गंमत आली. माझ्या सर्वात आवडत्या फोटोंपैकी एक.
(करी आपलीच स्तुती तो एक मूर्ख असे समर्थ सांगून गेलेत....स्मित)


बाकी गडावर तसे पाहण्यासारखे काही नाही.



त्यामुळे थोडेफार फोटो सेशन उरकून आम्ही पारगडचा रस्ता धरला. वाटेत एके ठिकाणी जेवण करून पारगडला पोचायला चांगलीच रात्र झाली. गाड्या पायथ्याशी पार्क करत आम्ही पायर्यांनी गड चढू लागलो तेव्हातर कडाक्याची थंडी जाणवायला लागली होती.
गंमत म्हणजे थोडे पुढे जाताच विश्वप्रार्थना ऐकायला यायला लागली..
हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे
सर्वांना सुखात आणि ऐश्वर्यात ठेव
सर्वांचं भलं करं, सर्वांचं रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे

ही खरं तर फार सुंदर प्रार्थना आहे पण ती ऐकली रे ऐकली की माझ्या डोळ्यासमोर जोशी वडेवालेच उभे राहतात. आयला गडावर पण शाखा उघडली का काय म्हणून कुतुहलाने पुढे सरकलो तर ध्यानमंदिर आणि त्यात ही कॅसेट अखंड वाजत ठेवलेली.
(नोट - इथे वामनराव पै यांचा कसलाही अवमान करण्याचा हेतू नाही..तसे कुणाला वाटल्यास आधीच क्षमा मागत आहे)
तसेच पुढे गेलो तर चक्क शाळा..गडावर मोठी वस्ती असल्याचे माहीती होते पण शाळा म्हणजे जरा गंमतच..शाळेच्याच पटांगणात बसवलेल्या फरशीवर तंबू टाकण्याचे ठरवले आणि परवानगी विचारायला जवळच असलेल्या खोलीपाशी गेलो.
तोवर दोन माणसे काय पाहिजे ते विचारत बाहेर आलीच. बोलता बोलता मी आत डोकावलो आणि थक्कच झालो. आता समिष भोजनाची तयारी होती पण चिकन, मटन नव्हते तर चक्क ससा किंवा त्यासदृश प्राणी होता. बाजूलाच त्याची कातडी वगैरे पडलेली होती. मी आत डोकावून पाहतोय हे त्या माणसांच्या लक्षात येताच त्यांनी पटकन दार लावून घेतले आणि आम्हाला काय पाणी वगैरे लागेल ते टाकीतून घ्या असे सांगून कटवले.
आम्ही अधिक तपशीलात जाऊनही काही उपयोग नव्हता त्यामुळे दिसल्या प्रकाराकडे चक्क डोळेझाक केली. (आता आम्ही केले ते चूक का बरोबर ते माहीती नाही) आणि उद्याच्या प्रवासाचे बेत आखत निद्राधीन झालो.

दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग - ४



रांगणाई देवीचे मंदिर आणि दिपमाळ
रात्र अगदीच शांततेत पार पडली. मुक्कामाला छानसे मंदिर मिळाल्यामुळे टेन्ट उभारा, गुंडाळा भानगड वाचली होती त्यामुळे एरवीपेक्षा पटापट आवरून आम्ही किल्ला भटकंतीला सुटलो.




ही मारूतीची मूर्ती आहे का?
रांगणा किल्लाही चांगलाच आडवातिडवा पसरलेला आणि पार्टीसाठी येणारे लोक पाणवठ्याच्याच आजूबाजूला फिरणार. त्यामुळे छानपैकी झुडपे वाढलेली. त्यातूनच मार्ग काढत जावे लागते. नंतर नंतर तर झुडपे इतकी वाढली की रस्ताच मिळायला तयार होईना. पण स्वप्नील एक दिशा धरून चालत राहिल्याने आम्हीपण त्याच्या मागोमाग चालत राहीलो. वाटेत जवळपास प्रत्येक झुडपाने बरेच दिवसांनी कुणीतरी मिळाल्याच्या आनंदात मनसोक्त ओरबाडून घेतले. जवळ जवळ अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर हा सासुरवास संपला आणि जरा मोकळ्यावर आलो. मला खात्रीच होती की ही वाट चुकली होती आणि झालेही तसेच. येताना आम्हाला खरीखुरी वरिजिनल वाट सापडली.


हे काय होते देव जाणे
असो, आता आलोच आहोत तर किल्ला पाहून घेऊ म्हणून तंगड्या दुखेपर्यंत भटकत राहीलो. तसे आता किल्ल्यावर पाहण्यासारखे काही नाही. काही बुरुज आणि तटबंदी थोडीफार शाबूत आहे.



काही ठिकाणी तटबंदी राजगडच्या संजिवनी माचीप्रमाणे दुहेरी तटबंदीने संरक्षित केली आहे.




रांगणा किल्ला चहुबाजूनी घनदाट अरण्याने वेढला गेला आहे आणि ते किल्ल्यावरून पाहताना चांगलेच जाणवते. पण आणखी किती काळ हे हिरवे आच्छादन राहणार आहे देव जाणे.



जितके शक्य होते तितके भटकून पुन्हा मंदिरापाशी आलो. सॅक उचलल्या आणि आल्या वाटेने निघालो.
वाटेत पाणवठ्यापाशी थांबून आदले दिवशीच्या स्वयंपाकाची भांडी घासणे हे मोठे काम होते. आणि नेहमीप्रमाणे मी आणि रोहननी भांड्याचा ताबा घेतला. आम्ही दोघे मन लाऊन भांडी घासत असतानाच खालच्या गावातून एक मोठा ग्रूप आला. आल्याआल्याच त्यांनी साफसफाई करून जेवणाची तयारी सुरू केली. समिष भोजनाचा बेत होता हे दिसतच होते त्यातच मंडळी टाकूनच आली होती.
त्यांच्याबरोबर जेवायला बसायचे आमंत्रण नाकारत आम्ही भांडी स्वच्छ करून निघालो तोच एकाने नाही त्या चौकश्या करायला सुरूवात केल्या. उगाच कशाला वाद म्हणून आम्ही शांतपणे उत्तरे देत गेलो. आम्ही ट्रेकर असून असे सगळे किल्ले आमच्या खर्चाने बघत फिरतो एवढे त्याला कळले.
"आरीच्या, मग तुमास्नी आमच्या चुलत्यांचा नंबर देतो. ते रेल्वेत हायेत, तुम्हाला कंदीपण लागला तर बिनधास्त फोन लावायचा काय"
अरे वा, रेल्वेत ओळख असलेली कधीपण चांगली असे म्हणत मी लगेच कागद पेन काढला. काय नाव त्यांचं
आत्ता सांगतो, असं म्हणत महाशय मेंदूचा कानाकोपरा धुंडाळू लागले. स्मित
"किशन्या, आमच्या चुलत्यांचं नाव काय रे लेका. आम्ही त्यांस्नी दादाच म्हणालोय ना. पर खरं नाव काय, भाड्या लवकर सांग, ते खोळंबलेत,"
"आरं तिच्या, तुझा चुलता काय *&^&^ मी त्याच नाव सांगाया, तुझा चुलता तुलाच ठावकी." स्मित
"त्याचं काय आहे साहेब, आत्ता थोडीशी घेतलीये ना, मंग डोस्क अजिबात आउट होऊन जाता. तुमचा नंबर देऊन ठेवा, उतारली की आटवून लग्गीच फोन करतो."
अरे देवा, हे भलतेच प्रकरण होते. मग मनात येईल तो नंबर कागदावर लिहून, भलतेच नाव सांगून त्याच्या हातात ठेवला आणि तिथून सुटका करून घेतली.
पुन्हा एकदा तो अद्भुत रस्ता पार करून, हाडे खिळखिळी करत पाटेवाटीत पोहोचलो. आता वेध लागले होते गढींग्लजचे.


गढींग्लज हे माझे आजोळ. माझे आजोबा सावकारी करायचे पण त्यांच्या भोळ्या आणि तापट स्वभावामुळे ती सावकारी फारशी चाललीच नाही. पुढे बाबा आणि त्यांचे भाऊ नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडले आणि मग गावात कुणीच राहीले नाही.
सगळेच भाऊ कोल्हापूर, पुणे, बंगलोर इथे स्थायिक झाल्यावर आजोबांनीही राहते घर विकून उर्वरीत आयुष्य मुलांकडेच काढले. आज्जी (तिला आम्ही अक्का म्हणायचो) तर वयाच्या ९८ पर्यंत खणखणीत होती. विशेष म्हणजे माझ्या जन्माच्या आधी एक वर्ष ते घर विकून टाकले आणि इतक्या वर्षांत कुणीच फारसे फिरकले नव्हते. फडणीस घराण्याचा वंशज तर बहुदा पहिल्यांदाच. त्यामुळे मला जामच एक्साईट व्हायला झाले होते. जिथे माझे आजोबा, पणजोबा राहीले, माझे वडील, काका वाढले त्या जागी याची देही याची डोळा भेट देण्याच्या भावनेनेच मला एकदम नॉस्टाल्जिक करून टाकले होते.
अर्थात गढींग्लजला पोहचल्यावर मनातल्या कल्पनांचा पार अगदी चुराडा झाला. बाबांनी त्यांच्या आठवणी सांगताना आख्खे गाव माझ्या डोळ्यासमोर उभे केले होते. ते कसे शाळेत जायचे, घर कसे होते, गाव वगैरे आणि मला हे अजिबातच लक्षात आले नाही की या गोष्टीला किमान ३०-४० वर्षे उलटून गेली आहेत. मी आपले बाबांच्या आठवणीतले जुने गाव शोधत होतो आणि सामोरे आले ते शहरीकरणाच्या मार्गावरचे, कसेही वेडेवाकडे वाढलेले गढिंग्लज.
बाबांचे एक वर्गमित्र आमची वाट पाहत थांबलेले होते. त्यांना तर काय करू काय नको असे झाले होते. माझ्या बाबांनी कॉलेजमध्ये असताना कोल्हापूर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला होता. आता मी पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन चाललोय असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते. स्मित
दरम्यान, गावात कसलीतरी जत्रा भरली होती. मग काय काकांना गुडनाईट करून आम्ही गावाची (गावाची आपली नावाला...पुण्याला चतुश्रुंगीची भरते तशीच काहीतरी) जत्रा अनुभवयाला निघालो. वाटेत मस्त चमचमीत चायनिजवर हात साफ केला आणि पुढे गेल्यावर दिसले थिएटर. पिक्चर लागला होता अजय देवगणचा दिल तो बच्चा है जी. असेही आता जेवण झाल्यामुळे सामानगडावर जाऊन फक्त पडीच टाकायची होती. त्यामुळे फारसा विचार न करता घुसलो. तिकीटाचे दर होते - स्टॉल १० रु आणि बाल्कनी २० रु. स्मित
मल्टीप्लेक्सची सवय झालेल्या आम्हाला हा धक्काच होता. अर्थात गावाकडचे थिएटर म्हणजे त्याच दर्जाचे होते. पिक्चर सुरु झाला आणि जो शिट्या, आरडा-ओरडा सुरु झाला. अरे देवा...कानाची वाट म्हणजे तीन तासांनी काही ऐकू येईल का अशी शंका वाटायला लागली. एकतर ९ ते १२ चा शो, त्यातून चुंबनसम्राट इम्रान हाश्मी...मग काय विचारता, कॉमेंटसना तर उत आला होता, हे व्हॅल्यू एडीशन आम्ही पिक्चरपेक्षा जास्त एन्जॉय केले. स्मित
रात्री सामानगडावर जाताना पुन्हा एकदा अपघात होता होता वाचला. उस गाळपाचे दिवस असल्याने सतत ट्रक आणि ट्रॉल्या भरून उसाची वाहतूक सतत सुरु होती. असाच एक ट्रॅक्टर समोर आला. त्याला नेमके पुढच्या बाजूचे लाईट मला अगदी डोळ्यावर आले आणि त्यामुळे त्या ट्रॅक्टरच्या मागची ट्रॉली किती पसरलीये याचा अंदाजच आला नाही. उसाची कांडकी ज्यावेळी हाताला आणि सॅकला घासली तेव्हा एकदम मला धक्का बसला. थोडक्या अंतराने मी बाजूला होतो अन्यथा आंधळेपणाने जाऊन ट्रॉलीलाच धडकलो असतो. बापरे, हे लक्षात येताच पायातले एकदम त्राणच गेले. कालचा तो झोपेचा किस्सा आणि आता हा यामुळे माझा गाडी चालवायचा कॉन्फिडन्सच गेला. अरेरे
शेवटी अमेयने माझी बाईक घेतली आणि मी रोहनच्या मागे बसून सामानगड गाठला. तिथल्याच एका देवीच्या नविनच बांधलेल्या सभामंडपात पथार्या टाकल्या आणि पुढील प्रवास सुरक्षित होवो अशी प्रार्थना करत डोळे मिटले.

दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग - ३



दुसरे दिवशी सकाळीच स्वप्नील सर्वांच्या आधी उठून छोटेखानी भटकंती करून आला होता. आम्ही पण पटापट चिक्क्या खाऊन नाष्टा भागवला आणि किल्ला पहायला सुटलो.


भूदरगड हाही भोज राजाने बांधला असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी जिंकल्यानंतर तो पुन्हा अदिलशाहीत गेला व नंतर पुन्हा महाराजांनी जिंकून घेतला. जिंजीवरून येताना राजाराम महाराज काही काळ या किल्ल्यावर वास्तव्यास होते. यापेक्षा किल्ल्याला जास्त इतिहास नाही. पण किल्ल्याचा विस्तार आहे मात्र भला थोरला. संपूर्ण फिरायला आख्खा दिवस जाईल असा. रात्री अंधारात आलो तेव्हा मुक्कामाची जागा पाहीली नव्हती. ती दिवसाउजेडी दिसली. एका वेगळ्याच बांधणीचे मंदीर..बाहेर दीपमाळ वगैरे..सुंदर प्रकार..


मंदिराच्या समोरच्या बुरूजावर ओतीव तोफ आहे. त्यावर आकृती कोरली आहे.


किल्ल्याची तटबंदी अजूनही खणखणीत आहे. जिन्याने वरती चढलो की आसमंताचे फार सुरेख दर्शन होते.






मग तळपत्या उन्हात छानपैकी चांदणसैर केली आणि तलावापाशी आलो. हा तलाव दुधी रंगाचा आहे आणि वार्‍यामुळे लाटा तयार होतात तो प्रकार फार भारी वाटतो.





हा किल्ला ऐवढा मोठा आहे की किल्ल्यावर चक्क मोठ्या प्रमाणावर शेती आहे. या तलावाचेच पाणी पंपाने खेचून सगळ्या पिकांना पुरवण्यात येते.


फिरून फिरून पाय तुटायच्या बेताला आले आणि उन्हाने डोके चांगले दुखायला लागले तेव्हा कुठे आम्ही पुन्हा मंदिराकडे परतलो. मग पटापट आवरून पुन्हा एकदा हॉटेल सचिन गाठले आणि भरपेट हादडून रांगण्याची वाट धरली.
रांगणा हा आमच्या भटकंतीमधला मुख्य आकर्षण होता. घनदाट वनराईने वेढलेला एकदम रांगडा किल्ला...
येक रांगणा खबरदार तो सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल असा उल्लेख खुद्द शिवछत्रपतींनी केला आहे. वाटेत मौनी महाराजांच्या मठाला भेट देण्याचे ठरवले होते पण तो काही योग आला नाही. वाटेत एक अनावस्था प्रसंग येऊ शकला असता. एकतर सकाळपासूनची झालेली दमणूक, त्यावर दुपारचे भरगच्च जेवण आणि बाईकवर येणारा थंडगार वारा याचा एकत्रित परिणाम होऊन प्रचंड पेंग यायला लागली होती. मी मोठ्या मुष्किलीने निद्रादेवीचे आवाहन परतावून लावत होतो पण एका बेसावध क्षणी डोळे मिटले गेले ते कळलेच नाही. अतिशय निग्रहाने डोळे उघडले तोवर माझ्या युनीने रस्ता सोडला होता आणि बाजूच्या गवतात घुसली होती. पटकन गाडी सावरली आणि पुन्हा रस्त्यावर आणली. वेग फारसा नव्हता आणि गाडी रस्त्याच्या बाहेर जाण्याऐवजी विरुद्ध दिशेच्या गाडीसमोर आली नाही हे मोठे सुदैव.
पुढे जाऊन गाडी थांबवली. तोपर्यंत मागेच असलेल्या स्वप्नीलला जाणवले काहीतरी गडबड झाली ते आणि तो ही थांबला. त्यावेळी गांभिर्य फारसे जाणवले नाही त्यामुळे जाम हसायला आले पण आत्ता लिहीताना जाणवतेय की काहीही घडू शकले असते. थंडगार पाण्याचे तीन-चार हबके मारून डोळ्यातील झोपेचा पूर्ण निपटारा केला आणि मगच पुढे निघालो आणि सरळ रांगण्याच्या दिशेने जात चिकेवाडी, पाटवाडी गाठली.
सुरूवातीला जरा बरा रस्ता सोडला तर नंतर एकदम खडबडीत रस्ता..त्या रस्त्यावर पार गाड्यांचा खुळखुळा वाजत होता. पण तेव्हा किंचितही कल्पना नव्हती की हा रस्ता हमरस्ता वाटेल अशा वाटेवरून पुढे जावे लागणार आहे.
चिकेवाडी ते रांगणा हा २५ किमी रस्ता केवळ अनुभवावाच असा आहे. मला फार वाईट वाटतयं की मी या रस्त्याचे फोटो नाही काढू शकलो आणि शब्दातही नीट वर्णन करता येईल का ते माहीती नाही.
रस्त्याचे साधारण वर्णन असे की बर्यापैकी अरूंद वाट, दोन्ही बाजूला झाडे-झुडपे अमाप वाढलेली, रस्त्यात मध्येच दगडी, मुरुम, त्यातच बाजूच्या झाडांच्या मुळ्या आलेल्या, अचानक वेडी वाकडी वळणे, मध्येच चढ, एकदम तीव्र उतार आणि भसकन गाडी चक्क ओढ्यात...


मी सर्वात पुढे होतो आणि मला शंभर टक्के खात्री होती की आम्ही रस्ता चुकलो आहोत. हा गाडीने जाण्याचा रस्ता असूच शकत नाही. राजगडला जाण्याच्या वाटेचा चढ कमी केला तर साधारण असेल अशी वाट गाड्यांसाठी असूच कशी शकेल. मी हा विचार करेपर्यंत झाडीतून थोड्या उघड्यावर आलो आणि धक्क्याने मला एकदम पडायलाच झाले.
समोर एक २०-सीटर व्हॅन उभी होती. आईच्चा...म्हणजे इथे यायला दुसरा रस्ता आहे की काय. गाड्या थांबवून त्या व्हॅनपाशी गेलो. त्या ड्रायव्हरला विचारलो बाबा रे कुठून आलास..
"हे काय तुम्ही आलात त्याच वाटेने...."
शप्पथ, त्यावेळे इतका प्रचंड धक्का मला कधीच बसला नव्हता. मी केवळ त्या ड्रायव्हरला साष्टांग नमस्कार घालायचाच बाकी ठेवला होता.म्हणलो अरे महाराजा आम्ही बाईक्स आणता आणता मेटाकुटीला आलो तु ही थोरली गाडी आणलीस तरी कशी.
"काय करणार राव एकदा गाडी घातल्यावर वळायला पन जागा नव्हती अन् रिव्हर्सबी जाईना..मग आणली ठोकत ठाकत..."
मनोमन त्याला सलाम ठोकून पुढे आलो तर आधीचा रस्ता बरा म्हणायची वेळ आली.


एका कोरड्या ओढ्यातून गाड्या पुढे काढल्या आणि पुढे चांगलाच मुरुमाचा उतार लागला. उतार इतका तीव्र होता की गाडीचे ब्रेक करकचून आवळले तरी गाडी सरकायची थांबेना..अरे देवा..मला जाणवले आता आपण पडणार...आणि झालेही तसेच..फक्त भुसभुशीत मातीत चाके रुतल्याने धापकन पडलो नाही.
गाडीवर दोन भल्यामोठ्या सॅक बांधल्याने एकदा बॅलन्स गेला की तो माझ्याच्याने सावरता येणेच शक्य नव्हते. त्यामुळे मुकाट्याने उठलो, अंगावरची धूळ झटकून टाकली आणि गाडी उचलण्यासाठी मागून येणार्‍यांची वाट पाहू लागलो.



मग सगळ्यांनी मिळून ते अवजड धूड उचलले आणि तसेच ठेचकाळत डेड एन्डपर्यंत आलो.
इथे रस्ताच बंद केला होता म्हणून नायतर डायरेक्ट किल्ल्यावर गाड्या चढवण्याचा माझा मानस होता. चला किमान ट्रेकच्या तिसर्या दिवशी आता थोडे तरी चालणे होईल म्हणत गाड्या पार्क करून गडाकडे निघालो. शिवगडाप्रमाणे इथेही थोडे खाली उतरूनच मग गडावर जावे लागते.
मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी रणमंडळ ही किल्ल्याची अतिशय भेदक संरक्षणक्षम रचना आढळते.


याचा कन्सेप्ट असा की शत्रूला अडचणीच्या जागी रेटून त्याचा खातमा उडवायचा. सगळ्यात पहिले म्हणजे भव्य बुरुजासमोर मुद्दाम मोकळी जागा सोडली आहे जेणेकरून शत्रु अगदी उघड्यावर येतो आणि त्यावर तोफांचा मारा करणे सोपे जाते. शत्रुसैन्याने नेट धरून पुढे मुसंडी मारलीच तर मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारी अरुंदशी पायवाट बुरुजाच्या उजवीकडून जाते. एका बाजूला बुरुज आणि दुसर्या बाजूला खोल दरी अशा चिंचोळ्या मार्गावरून येणार्या शत्रुसैन्याची वरून दगड, जळते पलिते इ. फेकून सहज वाट लावता येणे शक्य आहे. एक लहानशी तुकडीही शत्रुच्या हजारोंच्या सैन्याला पुरेशी ठरेल इतकी ही व्यवस्था जबरदस्त आहे.


दरम्यान मला पित्ताचा भयंकर त्रास व्हायला सुरूवात झाली होती. त्यातून ती अवजड सॅक आणि भरीला वजनी टेन्टपण माझ्याच कडे. त्यामुळे अक्षरश कष्टाने एकेक पाऊल उचलत मी पुढे चालू लागलो.


मुख्य प्रवेशद्वार ओलांडून पुढे आल्यावर चक्क तलावाच्या आकाराचा पाणीसाठा.


पण तिथेही खरकटी पडलेली, प्लॅस्टीकच्या पिशव्या, बाटल्या, कोंबड्यांची पिसे, बियरच्या बाटल्या..इथे यथासांग पार्ट्या होत असणार याची खात्री पटवून देणार्या...
त्या घाणेरड्या प्रकाराकडे डोळेझाक करून मनसोक्त पाणी प्यायलो आणि मंदिराच्या दिशेने वाटचाल करू लागलो तोच प्रचंड ढवळून आले आणि अगदी पोटाचा तळ खरवडून .....
हुश्श्य...उलटी झाल्यानंतर सगळे पित्त पडून गेले आणि एकदमच हलके हलके वाटायले लागले. दणादण उड्या टाकत मी बाकीच्यांना गाठले. आणि हलका झाल्यामुळे एकदम उंचावरच जाऊन उभारलो.


दरम्यान सूर्यमहाराज मावळतीकडे झुकले होतेच मग एक सुरेखशी जागा पाहून तो रम्य देखावा अनुभवला.


चांगला अंधार पडल्यावर थंडीही जाणवायला लागली होती आणि मला कडकडून भूक. त्यामुळे उठलो आणि अंधारात चाचपडत मंदीर गाठले. त्या तळ्यापासून मंदीर बरेच अंतरावर होते त्यामुळे स्वयंपाकासाठी फेर्या माराव्या लागणार हे कळून चुकले.
रांगणाई देवीचे मंदिर तर होते ब्येष्टच..त्या अंधाऱ्या, निर्जन, एकाकी किल्ल्यावर, सगळ्या बाजूने गर्द झाडीने वेढलेल्या मंदिरात राहण्याची खुमारी काही औरच होती. जंगलात राहण्याचा कितीही अनुभव आमच्या पाठीशी असला तरी प्रत्येक ठिकाणची मज्जा काही वेगळीच असते. कोयनानगरला अस्वले, बिबट्या आणि वन्यप्राणी असलेल्या जंगलात निवांत राहताना काहीही भिती जाणवली नव्हती पण इथे उगाचच एक अनामक भितीची लहर येऊन गेली. त्यात अमेयने मला आणि रोहनला पाणी आणायची आर्डर सोडली. एवढ्या लांब पाण्यावर जायला मी खरेतर नाखूश होतो पण पर्याय नव्हता. तेव्हा मी कुणाला सांगीतले नाही पण आत्ता कबूल करायला हरकत नाही..माझी बेक्कार .... होती तिथे पाणी आणायला जाताना. बरं नक्की कशाची भिती हे कळत पण नव्हते.
शेवटी भितीवर विजय मिळवला आणि सगळ्या बाटल्या भरून आणल्या. परत फेरी नको म्हणून तिथे पडलेल्या दोन-तीन बाटल्यापण भरून आणल्या. मग रुचकर खिचडी आणि शाही झोप...